गुढीपाडवा
विनासायास सरतील वर्षे
लोक उभारतील गुढ्या
जुन्याच काठीवर
आपण किती दिवस
पाहणार आहोत
क्षितिजावरचा अंधार
संचित, प्रारब्ध, भोग
अशा कुबड्यांच्या आधाराने
लागलो चालू...
तर एक दिवस
अंधाराच्याही पलीकडील काळोखात
रवानगी झालेली असेल
पंखात बळ,
मनगटात हिंमत
आणि छातीत धैर्य
आहे तोवरच पायाखालच्या वाटा तुडवून
पूर्ण करायला हवा
हा प्रवास
कोणी येईल मदतीला
त्याची वाट न बघता
नाहीतर
शेवट ठरलेलाच आहे
नाटकाचा
मग 'कपाळावरच्या रेषा
घडवत नाहीत नशीब
ते घडवतात मनगटं' या वचनावरचा विश्र्वासच उडून जाईल
वेळ कधीच गेलेली नसते
जेव्हा वाटसरू
तिच्या हातात हात घालून
मार्गक्रमण करत राहतो
अदम्य उत्साहाने
सोनेरी स्वप्नांचा
पाठलाग करत राहतो
पंखात वारा भरत राहतो
एकेका पावलागणिक
नव्या स्वप्नांच्या शोधात.
*................रमेश*
Comments
Post a Comment